Quick Reads
कार्ल मार्क्स : व्यक्ती नव्हे, प्रक्रिया
मार्क्सने जे मांडले त्या तत्वविचारांना मार्क्सवाद हे नाव पडणे अवास्तविक आणि दुर्दैवी आहे.
कार्ल मार्क्स या जगातून जाऊन जवळपास दीडशे वर्ष झाली आहेत. पण आजही जगभर त्याचं नाव दुमदुमत आहे. जर्मनीसारख्या छोट्या देशात जन्मलेल्या आणि लंडनच्या भूमीत दफन झालेल्या व्यक्तिचा विचार आज जगभर पसरला. याचाच अर्थ, १८८३ सालाच्या १४ मार्चला लंडनच्या हाय गेट स्मशानभूमीत जो गाडला गेला तो मार्क्सचा देह होता, त्याने मांडलेला विचार मात्र अजरामर झाला. विचार, विश्लेषण पद्धती, त्याने विकसित केलेले समाजशास्त्र जगभरच्या लोकांनी स्वीकारले आहे. एक लक्षात असू द्या, समाजशास्त्र काही मार्क्सने जन्माला घातले नाही तर ते आधीच जन्माला आलेले होते. मार्क्सने केवळ त्यात महत्त्वाची भर घातली अन ते आणखी विकसित केले. आता यात मार्क्सचे काय चुकले? का तो सत्ताधारी वर्गांच्या निशाण्यावर आला? जगभरचे शोषक वर्ग का त्याला गाडायला सज्ज झाले?
काही विचारवंत असे असतात ज्यांना विरोधकांकडून प्रखर विरोध होतो. जंग जंग पछाडून त्यांना कायमचे मातीत गाडायचा प्रयत्न केला जातो. पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा राखेतून झेप घेत राहतात. कार्ल मार्क्स असाच एक विचारवंत होता. खरं तर त्याला विचारवंत म्हणून स्थापित व्हायचं नव्हतं. या क्षेत्रात त्याला कोणतंही करियर करायचं नव्हतं, त्याला कुठलेही पुरस्कार मिळवायचे नव्हते की कुठे मिरवायचंही नव्हतं. गरिबीचे चटके सहन करत जगणारा, दोन वेळच्या अन्नाला मोताद होता तो.
ठरवलं असतं तर तो वकील, प्राध्यापक, संपादक काहीही बनू शकला असता. तेव्हढं क्वालिफिकेशन होतं त्याचं. पण त्याला कामगार वर्ग खुणावत होता. औद्योगिक क्रांती नंतर उदयाला आलेल्या व्यवस्थेमुळे भौतिक प्रगती होऊ लागली पण विषमता प्रचंड वाढू लागली. नव्याने उदयाला आलेले औद्योगिक कामगार (सर्वहारा) खूप हाल अपेष्टांमध्ये जगत होते. प्रचंड दमन आणि पिळवणूक. त्याचा राग कामगार यंत्रावरच काढायचे. तोडफोड करायचे. विचारवंत अस्वस्थ होते. विषमतेवर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे विचार मांडले जात होते. कुणी म्हणत होते भांडवलदाराने अति संचय करू नये, कुणी म्हणत होते दयाळू वागा, कुणी म्हणत होते कुठे तरी लांब निर्जन बेटावर शोषणमुक्त समाज निर्मितीचा प्रयोग करता येईल, तर कुणी म्हणत होते भांडवलदाराने विश्वस्त बनून समाज व्यवस्था चालवावी. अनेक विचार, मत-मतांतरे. पण तळ कोणालाच लागत नव्हता, सगळे वर-वर चाचपडत होते.
अनेक विचार, मत-मतांतरे. पण तळ कोणालाच लागत नव्हता, सगळे वर-वर चाचपडत होते.
अशा वातावरणात मार्क्स उभा राहत होता. समजून घेत होता. कामगारांच्या बाजूने विचार करत होता. त्याने समाजशास्त्रीय अभ्यास सुरू केला आणि स्वतःचे पूर्ण जीवन त्यात झोकून दिले. कामगार कष्टकऱ्यांना सुद्धा स्वतःचे तत्वज्ञान असते, समाज घडविण्याची-चालविण्याची त्यांची पण स्वतंत्र योजना असते, ते संबंध समाज व्यवस्था ताब्यात घेऊन धुरीण बनू शकतात हा शास्त्रीय सिद्धांत जगात सर्वप्रथम मार्क्सने शोधला आणि मांडला. यात अलौकिक असे काही नव्हते. मार्क्स वास्तवाला भिडला, शोधत गेला, झोकून दिले आणि त्याला सूत्र सापडत गेली. त्याने एकदा धरलेली विचारांची कास सोडली नाही, हेच त्याचे महान कर्तृत्व.
५ मे १८१८ रोजी जन्मला अन १४ मार्च १८८३ ला लंडन येथे मेला. हो मेलाच. जशी साधी कष्टकरी माणसं जगतात तसा जगला अन तसाच मेला. त्याच्या हयातीत त्याने पोतंभर ग्रंथ लिहिले. तो असतांना काही प्रकाशित झाले तर काही त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. मार्क्स हा एकमेव विचारवंत आहे ज्याच्या विचारांचे विश्लेषण करणारे ट्रकभर नव्हे तर ट्रेनभर ग्रंथ गेल्या जवळपास दीडशे वर्षात लिहिले गेले आहेत. आजही लिहिले जात आहेत. त्याने जेव्हढं लिहिलं त्याच्या जवळपास शंभरपट लिखाण त्याच्यावर जगभरच्या विविध देशात विविध भाषांमध्ये झाले आहे.
कार्ल मार्क्स कुणा एका देशाचा होता असं म्हणता येणार नाही. संपूर्ण जगातल्या सर्व देशातील कष्टकरी, श्रमिक, शोषित-पीडित जनतेचा तो पाठीराखा होता. त्यांच्या मुक्तीचा उद्घोष करणारा द्रष्टा क्रांतिकारक होता. परंतु असे असले तरी हा अगदी एकाकी मेला. मोजून ११ माणसं होती याच्या मयतीला. कायम कफ्फलक राहिला. आयुष्यभर नुसती पुस्तकं लिहीत बसला. अन्न-पाण्याला मोताद झाला. जरा येडाच होता हा. इतका शिकला-सवरला पण उगा येड्यागत अभ्यास करत बसला. म्हणे दारिद्रयाचं गोत्र काय? अन् गरिबीचं मूळ काय? शोधत बसला बेभान होऊन रात्रं-दिवस. चांगला उच्चशिक्षित डिग्रीधारी होता. ठरवलं असतं तर स्वतःचा उत्कर्ष साधत बसला असता.
पण नाय. ह्याच्या डोक्यात वेगळाच भुंगा होता. हा म्हंटला, "मुद्दा केवळ जग समजून घेण्याचा नाहीये. मुद्दा आहे जग बदलण्याचा!" असा हा येडा-फकीर जगाच्या इतिहास, वर्तमान आणि भवितव्याचं मर्म शोधता-शोधता आयुष्य खर्ची करून बसला. अन तसाच एक दिवस मरून गेला. जाता-जाता सगळ्यांच्या डोक्याला खुराक देऊन गेला. बरंच काय-काय मांडून गेला. त्यानं जे लिहिलं ते सगळं मिळून असेल पोताभर. मामला तिथंच संपावा ना! पण नाय, खरा मामला तर पुढेच घडला. त्याच्या पोताभर ग्रंथावर जगभर जे साधक-बाधक, पॉजिटीव्ह–निगेटीव्ह, विश्लेषण-बिश्लेषण झालं ते एकत्र केलं तर तीस-बत्तीस डब्यांची मालगाडी भरेल.
असं काय ब्वा मांडलं यानं?
माणसाचं डोकं असतं हातभर अन् आतला मेंदू वितभर. मग असा करून-करून त्यानं विचार तरी काय केला? आजही लोक त्यावर काथ्याकूट करत बसलेत. समर्थकांचं ठिकाय, पण विरोधकांना भारीच कामाला लावलंय त्यानं. टीका-टिप्पणी, बदनामी, विपर्यास, अपप्रचार, विद्रूपीकरण सगळं चालतं याच्या बाबतीत. थोडक्यात याचे विरोधक दांडक्याला तेल लावून मागावरच असतात. दिसला मार्क्स की घाल डोक्यात दांडकं! हा गपगुमान दंडुका खातो. टिंगल-टवाळी, निंदा-नालस्ती सहन करतो, अन् शांतपणे एका कोपऱ्यात उभा राहून मंद स्मित करत बघत राहतो.
का बरं असं वागतो हा?
तो असं म्हणतो, मार्क्सवादाच्या नावाखाली जे नंतर पुढं आलं ते त्याचं होतं पण त्याचं नव्हतं.
च्या मारी! ही काय भानगडय? त्याचं होतं पण त्याचं नव्हतं! तर त्याचं असं आहे की मार्क्सच्या आधी ज्या समाजशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विचारवंतांनी जे मांडलं होतं त्याला आवश्यक तिथं त्यानं दुरुस्त केलं. त्यात योग्य ती भर घातली. काही बाबतीत जे डोक्यावर उभं होतं त्याला पायावर उभं केलं.
थोडक्यात समाजविज्ञान पुढच्या पायरीवर विकसित केलं. भांडवलशाही जन्माला यायच्या काळात समाजविज्ञान खर्या अर्थाने आकाराला येऊ लागलं. पण खूप प्राथमिक अवस्थेत होतं. बाल्यावस्थेत होतं म्हणा ना. मार्क्सच्या रिसर्च एंड कॉन्ट्रीब्युशननंतर त्याला सौष्ठव आलं. ठोस आकार आला. निश्चित दिशा मिळाली. पण तरी ते परिपूर्ण झालं का? तर नाही. कोणतंही विज्ञान परिपूर्ण कधीच नसतं. ते प्रयोगातून सातत्याने विकसित होत असतं. आधीची गृहीतकं पुन्हा पुन्हा तपासून नवी मांडणी करावी लागते.
थोडक्यात, मार्क्सनं जे मांडलं त्याला मार्क्सवाद म्हणणं म्हणजे मार्क्सच्या मेहनतीवर माती टाकणं आहे. आणि ते मार्क्सवर अन्याय करणारं पण आहे. ते समाजविज्ञान आहे. ते मार्क्सच्या मालकीचं नाही. त्यावर त्याचा कुठलाही कॉपीराईट नाही. असूच शकत नाही. कारण मार्क्सच्या डोक्यातून ते अवतरलेलं नाही. समाजात या आधी जे जे विचार झाले, चिंतन झालं, मांडणी झाली, त्याला मार्क्सनं पुढच्या टप्प्यावर विकसित केलं. त्यानंतर येणारा समाज त्याला आणखी विकसित करेल. हे असं एकमेकांच्या अनुभावातून शिकत पुढे जाण्याचा मुद्दा आहे. याकडं वस्तुनिष्ठपणे बघायला हवं. तसंच हे समजून घ्यायला हवं की जगभर मार्क्सचा विचार का स्वीकारला गेला.
कार्ल मार्क्स इतका दखलपात्र का ठरला?
● कारण मार्क्सवाद हे काही मार्क्सच्या डोक्यातील खूळ नव्हे !
● बसल्या बसल्या त्याला सुचलेले 'शहाणपण' नव्हे की
● उगाच केलेला तो काहीतरी काथ्याकूट नव्हे.
मार्क्सपूर्व जे विचारवंत होते त्यांनी समाज विकासाचे आणि समाज बदलाचे काही नियम शोधून काढले होते. पण ते शोध पुरेसे नव्हते. जसे न्यूटन आणि आइन्स्टाइननंतर भौतिकशास्त्रीय अभ्यास थांबले नाहीत तसेच समाजशास्त्रात पण सातत्याने नवनवे शोध होत राहिले. मार्क्सपूर्व काळात सेंट सायमन, रॉबर्ट ओवेन, चार्ल्स फ्युरिए, हेगेल इत्यादी विचारवंत मानवी समाजाचा अभ्यास करतच होते. परंतु मार्क्स असा पहिला समाजशास्त्रज्ञ आहे जो म्हणाला की मुद्दा केवळ जग समजून घेण्याचा नाही तर जग बदलण्याचा आहे!
मार्क्सपूर्व जे विचारवंत होते त्यांनी समाज विकासाचे आणि समाज बदलाचे काही नियम शोधून काढले होते. पण ते शोध पुरेसे नव्हते.
त्याला अनेक प्रश्न पडले होते. उत्तराच्या शोधात तो वणवण फिरत राहिला. त्याने त्याच्या पूर्वी मांडले गेलेल्या सामाजिक विचारांचा अभ्यास केला आणि त्या विचारांना पुढच्या टप्प्यावर नेत त्याला आधुनिक, मानवकेंद्री समाजशास्त्राचे रूप दिले. त्याने जे काही मांडले ते एक सोशल सायन्स आहे.
जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी शास्त्र, तसेच हे समाजविकासाचे शास्त्र. जसे आपण भौतिकशास्त्राला न्यूटनशास्त्र म्हणत नाही, रसायन शास्त्राला अल्फ्रेड नोबेलशास्त्र म्हटले जात नाही. जशी वेगवेगळी शास्त्रे मानवी विकासाच्या क्रमात टप्याटप्याने विकसित होत आली. अनेक प्रयोग आणि यश-अपयशातून तावूनसुलाखून निघाली. जी आजही विकसित होत आहेत. तसेच मार्क्सने मांडलेले समाजविकासाचे सूत्र अंतिम नाही. त्याला पुढे नेण्याची, सातत्याने विकसित करण्याची आव्हाने मानवी समाजासमोर आहेतच.
त्यामुळे मार्क्सने जे मांडले त्या तत्वविचारांना मार्क्सवाद हे नाव पडणे अवास्तविक आणि दुर्दैवी आहे. खरंच या समाजशास्त्राला काहीतरी वेगळे नाव असायला हवे होते. मार्क्सने मांडले म्हणजे मार्क्स त्याचा मालक होऊ शकत नाही. जसा न्यूटन किंवा आइन्स्टाइन भौतिकशास्त्राचा मालक नसतो. केवळ भाष्यकार असतो. तसाच मार्क्स सुद्धा एक भाष्यकार आहे.
त्याने जे मांडले ते खरं तर समाज विज्ञानाची पुढची पायरी आहे. पण ती अंतिम पायरी नाही. त्याला आणखी विकसित करण्याची, आपापल्या देशातील परिस्थिती आणि समाजवास्तव लक्षात घेऊन पुढे नेण्याची गरज आहे.
मार्क्सवादाला गाडून टाकण्याचे, नेस्तनाबूत करण्याचे, कालबाह्य ठरविण्याचे काम शासक-शोषक वर्गाचे आहे, ते त्यांनी खुशाल करावे. नेटाने करावे. ती त्यांची गरज आहे. आपण का त्या दुष्प्रचाराला बळी पडायचे ? आपण जनतेचे, शोषितांचे, सर्वहारांचे जर पाठीराखे असू तर आपण मार्क्सपर्यंत आणि मार्क्सनंतर समाजशास्त्र (Social Science) कुठपर्यंत विकसित झालंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू या!
मार्क्सने नेमके काय मांडले?
मार्क्सवाद स्वीकारा अगर न स्वीकारा तो तुमचा ‘चॉईस’ आहे. पण आज मानवी समाज इतक्या संकटात असतांना समोर असलेल्या बिकट प्रश्नांची उत्तरे तर शोधावी लागतील ना! मार्क्सने खालील मुद्द्यांवर मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले आणि विचार मांडले आहेत.
१) द्वंद्वात्मक भौतिकवाद (Dialectical Materialism)
२) ऐतिहासिक भौतिकवाद (Historical Materialism)
३) वरकड मूल्याचा सिद्धांत (Surplus Value)
४) वर्गसंघर्ष (Class Struggle)
५) क्रांती (Revolution)
६) सर्वहारा वर्गाचे अधिनायकत्व (The dictatorship of the proletariat)
७) साम्यवाद (Communism)
वरील विचार आता क्रमशः बघू या. यातलं किती काळाच्या ओघात टिकलंय आणि कोणतं प्रश्नांकित आहे ?
१) द्वंद्वात्मक भौतिकवाद : असे तत्वज्ञान ज्याला कोणीही चॅलेंज दिलेले नाही, ते नाकारलेले नाही. याबद्दल कोणी वाद घालत नाही. त्यापूर्वीच्या भौतिकवादी तत्वज्ञानाचे ते अधिक विकसित आणि वैज्ञानिक स्वरूप आहे. ते अचानक आकाशातून किंवा कोणा बुद्धिवानाच्या डोक्यातून टपकलेले नाही. ती क्रमात विकसित झालेली मानवी समाजाची बौद्धिक मालमत्ता आहे. कार्ल मार्क्सने तिची मांडणी केली आहे.
२) ऐतिहासिक भौतिकवाद : इतिहासाकडे बघण्याची अशी दृष्टी त्याबद्दल कोणाचेही दुमत असू शकत नाही. हे सुद्धा निर्विवाद आहे. या मांडणीवर नंतर अनेक गृहीतके बेतली आणि मानवी समाज बौद्धिक दृष्ट्या अधिक समृद्ध झाला. मानवी समाज आला कुठून आणि जाणार कुठे याची दिशा कळली. पाप-पुण्य, मागच्या जन्माच्या कर्माची फळे इत्यादी भंकस तत्वज्ञान या सिद्धांताने एक लाथेसह उडविले. मानवसमाज शोषणमुक्त होऊ शकतो, हा स्पष्ट विचार शोषित समुदायांना दिला आणि त्यांना पुढचा मार्ग दाखविला.
३) वरकड मूल्याचा सिद्धांत : मार्क्सने शोधलेले भांडवली अर्थ व्यवस्थेचे असे गमक जे भांडवली अर्थतज्ञ खोडून काढू शकलेले नाहीत. उलट भरमसाठ नफेखोरी आणि संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे भांडवलशाही स्वतःचे थडगे स्वतः खणते, पुन्हा पुन्हा अरिष्टात अडकते आणि वाट शोधायला भांडवली विचारवंत मार्क्स वाचतात. अर्थात, मार्क्सने काही या बांडगुळांसाठी ते लिहिले नाही.
४) वर्गसंघर्ष : याबद्दल वेगवेगळी मते आहेत. जसे की भारतात केवळ वर्गसंघर्ष नसून तो जात-वर्ग संघर्ष आहे. या म्हणण्याला निश्चितच ठोस आधार आहेत. यावर सगळ्यात महत्वाचे तत्वज्ञानात्मक काम कॉ. शरद पाटील केले आहे. त्यांनी भारताच्या संदर्भात हे तत्वज्ञान पुढच्या टप्प्यावर विकसित केले आहे. यावर आणखी प्रयोगांची आणि संशोधनाची गरज आहे. मार्क्सवाद हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने ऍप्लाय होणार. तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार. भारतीय प्रयोग खूप भिन्न असतील. त्या अनुरूप व्यवहार अजून व्हायचा आहे. डाव्या चळवळीची तशी संरचना, कार्यपद्धती, मेथड्स, अजेंडा अजून डेव्हलप व्हायचा आहे. डाव्या चळवळीच्या नेतृत्वाचे क्लास-कास्ट कॅरेक्टर हे सर्व इथल्या मातीअनुरूप व्हायचे आहे. त्याशिवाय डावी चळवळ उभारी घेऊ शकणार नाही. तो पर्यंत जे आहे ते आहे. कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र काम आणि असंख्य आंदोलनांचे नेतृत्व करूनही डावे भारतीय जनमानसाची नसनाडी काही पकडू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे.
५) क्रांती : हा प्रयोगाचा मुद्दा आहे. अनेक प्रयोग फसत,रखडत जसे भौतिक, रसायन किंवा इतर शास्त्रातील शोध लागत गेले तसे मागील अनुभवातून शहाणे होत क्रांतीचे नवनवे प्रयोग जगभर होतच राहणार. रशियन आणि चीनची क्रांती यशस्वी झाली पण आज तेथील व्यवस्था फिरून पुन्हा भांडवलशाहीच्या वाटेवर आलीय. याचा अर्थ क्रांती ही संकल्पना जगातून कायमची नामशेष झाली असे नव्हे. जो पर्यंत विषमता आणि शोषण आहे क्रांतीची निकड राहणारच. अर्थात याचे एकच एक मॉडेल नसेल. प्रत्येक देशाच्या परिस्थिती, विकासाचा टप्पा आणि वर्गीय संरचना लक्षात घेऊन प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग होतील. क्रांतीचे अग्रदल कोण कामगार की शेतकरी, ग्रामीण सर्वहारा की औद्योगिक मजदूर हा वादग्रस्त मुद्दा आहेच. यावर खूप मत-मतांतरे आहेत.
६) सर्वहारावर्गाचे अधिनायकत्व: हा वादाचा मुद्दा आहे. सर्वहाराचे अधिनायकत्व याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. हा न सुटलेला मुद्दा आहे. जो आजही प्रलंबित आहे. रशिया आणि चीनमध्ये सर्वहाराच्या अधिनायकत्वाच्या नावाखाली काही भलतंच घडलंय. तिथे सर्वहाराच्या अधिनायकत्वाच्या नावाखाली पक्षाचीच हुकूमशाही आली. यातील 'डेमोक्रॅटिक सेंट्रलिज्म' ही संकल्पना सुद्धा निर्विवाद नाही. त्यात बरेच व्यावहारिक घोळ आहेत. शोषणमुक्त समाजात नव्या प्रकारची लोकशाही कशी असेल यावर अजून तोडगा निघायचा आहे. मानवी समाजासमोर ते मोठे आव्हान आहे.
७) साम्यवाद : हा प्रश्न अनुत्तरित आणि प्रलंबित आहे... मार्क्सने याबद्दल ढोबळमानाने मांडणी केली पण व्यवहारात याचे उत्तर अजून शोधायचे आहे. मानवी समाजाचा पुढचा टप्पा काय असेल? मानवी समाजाला, पुढच्या पिढयांना याचे उत्तर शोधायचे आहे. याचा कोणताही रेडिमेड फॉर्म्युला नाही. जो पर्यंत प्रयोगाच्या पातळीवर सिद्ध होत नाही, तोपर्यंत तरी तो युटिपियाच.
मानवी इच्छा आणि अपेक्षा यावर सर्व काही अवलंबून नसते. तुमच्या, माझ्या किंवा कोणा महामानवाच्या इच्छेने मानवी समाज चालत नसतो. मानवी समाजाचे स्वतःचे काही एक गतिशास्त्र असते. समाज विकासाचे काही एक नियम असतात. ते समजावून घेतल्याशिवाय आपण समाजाची दिशा बदलू शकत नाही. अस्तित्व आधी का विचार आधी, पदार्थ आधी का जाणीव आधी? तत्वज्ञानाचा हा मूलभूत प्रश्न आहे. मार्क्सने भौतिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केलाच त्याच बरोबर त्याने या भौतिक परिस्थितीला कसे बदलायचे याचे सूत्रही मांडले.
थोडक्यात, मार्क्स हा केवळ विचारवंत नव्हता तर तो तत्वज्ञ होता. कष्टकऱ्यांचा तत्वज्ञ. ज्याने कष्टकऱ्यांच्या हाती क्रांतीचे तत्वज्ञान दिले. त्याचे विचार काही धर्मग्रंथ नव्हे. ते सातत्याने तपासले जाणारे, चिकित्सा होणारे आणि प्रयोगातून विकसित होणारे शास्त्र आहे. मार्क्सवाद हे एक सायन्स आहे हे यावरून सिद्ध होते की आपण त्याची सूत्रे व्यवहारात तपासू शकतो, आवश्यक असेल तिथे त्यात बदल वा सुधारणा करू शकतो. मार्क्सवाद स्थितीशील नाही. ते जडसूत्र नाही. कोणा महात्म्याने सांगीतलेले पवित्र वचन नाही. ते सातत्याने विकसित होणारे गतिशील समाजविज्ञान आहे.
जशी इतर शास्त्रे विकसित होत गेली तसे सोशल सायन्सही आणखी विकसित व्हायचे आहे. मार्क्स हा त्यातील एक टप्पा होता. पण तो काही अंतिम बिंदू नव्हे. चला एकवेळ मार्क्सला आपण नाकारू या, पण मानवी समाज पुढे कुठे जाणार याचे उत्तर तर शोधावे लागेलच.
मार्क्सला विदेशी ठरविण्यात, बुद्धाला मार्क्सच्या विरोधात उभा करण्यात काही अर्थय का मित्रांनो!
मार्क्सला विदेशी ठरविण्यात, बुद्धाला मार्क्सच्या विरोधात उभा करण्यात काही अर्थय का मित्रांनो! कशाला वेळ वाया घालवायचा यात. बुद्धाच्या काळात बुद्धाला जे शक्य होते ते बुद्धाने केले. मार्क्सच्या काळात मार्क्सला जे शक्य होते ते मार्क्सने केले. प्रत्येकाला स्थळ-काळाच्या मर्यादा असतातच ना. अलौकिक काही नसते. सगळी हाडामांसाचीच माणसं. या बाबतीत नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेत मांडलेली जानकीअक्का मला आवडते. तिच्यात मला माझी आई दिसते.
माझ्या आईला मी मार्क्सचा फोटो दाखवून एकदा म्हणालो, (तिच्याशी मी नेहमी हरियाणवीत बोलायचो) 'देख, यू आदमी था जर्मन देस म. इसना लिख्या विचार समाज बदलण का' आई क्षणभर त्या फोटोकडे बघत राहिली आणि म्हणाली, 'यू तो कोई फकीर सा दिखं सं. मी म्हणालो, 'हां, फकिरांनं ही बदल्या ह इतिहास यहां!’
नारायण सुर्वें खूप सुंदर पद्धतीने व्यक्त करतात.
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला.
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.
जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –
ह्यो आमचा मार्कसबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.
‘सन्याश्याला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’
माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला.
पुढे एका सभेत मी बोलत होतो,
तर या मंदीचे कारण काय
दारिद्र्याचे गोत्र काय
पुन्हा मार्क्स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,
आणि घडाघडा बोलतच गेला.
परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.
मी म्हणालो,
‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,
यापुढच्या सर्वच चरित्रांचेही.’
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत;
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,
‘अरे कविता-बिविता लिहितोस की काय
छान, छान.
मलासुद्धा गटे आवडायचा.’
मार्क्सने जे मांडलं त्याला मार्क्सवाद म्हणणं का चुकीचं आहे?
इतर कोणत्याही विज्ञानाला आपण त्या त्या संशोधकाचं नाव दिलंय का? आपण भौतिकशास्त्राला ‘न्यूटन शास्त्र’ किंवा ‘आईनस्टाईन शास्त्र’ म्हणतो का?रसायनशास्त्राला ‘मायकल फॅरेडे शास्त्र’ किंवा ‘मारी क्युरी शास्त्र’ म्हणतो का? जीवशास्त्राला ‘चार्ल्स डार्विनवाद’ किंवा ‘लुई पाश्चरवाद’ म्हणतो का? नाही. कारण शास्त्र म्हणून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. वाटचाल आहे. या संशोधकांच्या आधीही (भलेही अविकसित रूपात का असेना) ते होतं. आणि नंतर ही सातत्याने विकसित होत आहे. मग समाजविज्ञानाला मार्क्सवाद का म्हणायचं?
हे असं कोणा एका व्यक्तीच्या नावाखाली एखादं शास्त्र बंदिस्त करणं योग्य आहे का? हो, योग्य आहे! भांडवलदारांच्या दृष्टिनं योग्य आहे! का? तर तसं केल्यानं त्याला झोडपणं अन निकालात काढणं सोप्पं होतं. सगळं बील मार्क्सच्या नावावर फाडून मोकळं होता येतं.
भांडवलदारांना इतर शास्त्र त्रासदायक नसतात. समाजशास्त्र मात्र तापदायक असतं. कारण त्यात मानवीसमाजाच्या प्रश्नांची उकल केली जाते. म्हणून ते एका लिमिटपर्यंतच विकसित होऊ द्यायचं असतं. अन तेव्हढंच फक्त विद्यापीठांमध्ये शिकवायचं असतं. पण या मार्क्सनं सगळी लिमिट तोडली ना राव! त्यामुळं झोडपा मार्क्सला! अशी शोषकांची नीती असते.
म्हणून मार्क्स कोपर्यात उभा राहून गप मंद स्मित करत म्हणत असतो, अरे भुसनळयांनो! सोडा माझं नाव. माझं नाव-बीव घ्यायची गरज नाही. माझे पुतळे उभारायची गरज नाही की माझ्या जयंत्या-मयंत्या करायची गरज नाही. जा बघा तिकडं जाऊन जगातलं पहिलं कामगार राज्य रशियात का कोसळलं? चीनमध्ये का भरकटलं? भारतात शोषणमुक्तिकडे जाण्याचा मार्ग कम्युनिस्ट, सोश्यलिस्ट, आंबेडकराईट यांना का सापडत नाहीये? माझ्या काळात मला जी साधनं उपलब्ध होती त्या आधारे मी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हढा उमगला तेव्हढा मांडला. माझा पिच्छा सोडा रे! आता पुढचा मार्ग तुमचा तुम्ही शोधा. त्या जयंत्या-मयंत्या, पुतळ्यांच्या ऊंच्या-बिंच्यांचा नादात लई अडकू नका! प्रतिकं नाचवण्यात वेळ घालवू नका! प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करा!
खर्या प्रश्नांना भिडा राव!
जाता जाता एक महत्वाचं, त्यांचं समाजविज्ञान अन आपलं समाजविज्ञान, परदेशी समाजविज्ञान आणि स्वदेशी समाजविज्ञान, डॉ. आंबेडकरांचं समाजविज्ञान आणि कार्ल मार्क्सचं समाजविज्ञान असं वेगवेगळं काही नसतं. इथून तिथून सगळं एकच आहे. शोषणाची रूपं वेगवेगळी असली तरी त्याची साखळी एकच आहे. विषमतेची उतरंड एकच आहे. मुक्तिच्या आकांक्षा इथून-तिथून सारख्याच आहेत.
जगाची वाटचाल, मानवी समाजाचे गतिनियम सगळीकडे सारखेच आहेत. फक्त त्याची गती, दिशा, पद्धत स्थलकाल सापेक्ष असते. इकडचं तिकडे अन तिकडचं इकडे लागू पडत नाही, असं काही नसतं. तिकडचे वैज्ञानिक शोध आणि साधनं आपण वापरतोच की नाही? तेव्हा आपण म्हणत नाही की हे तिकडचं आहे इकडे लागू पडणार नाही. आपलं आयुर्वेद तिकडे लागू पडत नाही असं आहे का? नाही ना! मग आपण वैश्विक दृष्टिकोन कधी स्वीकारणार? कुपमंडूकता कधी सोडणार?
जातविषमतेने गांजलेला भारतातला दलित-मागासवर्गीय असेल, वर्णभेदाच्या कचाट्यात अडकलेला अमेरिकन ब्लॅक असेल, धर्मसत्तेमुळे भिकेला लागलेला पाकिस्तानी सामान्य जन असेल, किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांची मुजोरी सहन करणारा आफ्रिकन समाज असेल. सगळ्यांचा झगडा मुक्तीसाठीच आहे. एकमेकांच्या वेदना समजून घेतच आपल्याला मार्ग शोधायचा आहे. जगातल्या कष्टकर्यांनो एक व्हा! अशी बुलंद घोषणा देणारा कार्ल मार्क्स संपूर्ण जगातील कष्टकर्यांचा मित्र आणि मार्गदर्शक आहे.
अमरनाथ सिंग हे 'सृजन' चे कार्यकारी संपादक, लेखक, अनुवादक, फिल्ममेकर आहेत.
ते मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये लेखन करतात. त्यांचे पालक १९५० च्या दशकात हरियाणातून रोजगाराच्या शोधार्थ महाराष्ट्रात आले. अमरनाथ यांचा जन्म १९६६ साली नाशिकजवळील वैतरणानगर येथे झाला.
१९८०-९० च्या दशकात ते श्रमिक चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. त्यानंतर सुमारे एक दशक सांस्कृतिक कार्यकर्ता आणि कलाकार म्हणून त्यांनी कार्य केले.